बाबा, आठवतं का तुम्हाला....?
लहानपणी शाळेच्या पहिल्या दिवशी
तुम्ही अन् आई आला होतात ....
मी रडत होते शाळेत न जाण्यासाठी
आईचाही जीव कळवळला होता
मला असं एकटं सोडायला .....
अशी एकमेकांपासून दूर जायची
ती पहिलीच वेळ -- तुमचीही अन् माझीही.....
पण तुम्ही निश्चल होतात...
राकट सह्यांद्रीसारखे...
आईला समजावत होते तुम्ही
"गाड़ी रुळावर आणायची आहे ना ?
धीर ठेव..अगं आपलीच कळी ती
फुलायची आहे अजून....."
आईही मग गप्प बसली
काहीतरी समजल्यासारखी.....
अन् मग घरी येऊन गप्प बसलात..
काहीतरी विचार करत...माझी बाहुली गोंजारत ...
तुम्ही शांत होतात अगदी शीतल चांदण्यासारखे
पण...आसवांचा पूर आला होता बेफाम नदीप्रमाणे
तुमचंही मन झालं होतं......हळवं,निरागस .....
अगदी...... अगदी माझ्यासारखं......
हळवं मन.........
Info Post
0 comments:
Post a Comment